Saturday 2 December 2017

विश्वगुरुंचे २४ गुरु - एक तत्वबोध

भाष्य
लेखांक - १०   दि. ३ डिसेंबर २०१७

विश्वगुरुंचे २४ गुरु - एक तत्व बोध

       आज मार्गशिर्ष पौर्णिमा, म्हणजेच श्री दत्त जयंती. विश्वगुरु आणि माझे परमगुरु भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म दिवस. जगाला शांती, सहचर्य आणि सात्विकतेची शिकवण देणार्या अवधूतंचा हा प्रकट दिन. स्रुष्टीचे निर्माते ब्रह्मदेव, पालनकर्ते विष्णू नारायण व संहारकर्ते भगवान शिव या त्रिदेवांचा संगम ज्याच्यात झाला तेच हे दत्तात्रय. मानवी जीवनाला सदाचरणाचा संदेश देणारे दत्तात्रय अखिल विश्वाचे व चराचर स्रुष्टीचे मार्गदर्शक आहेत. म्हणूनच विश्वगुरु ही उपाधी त्यांच्या साठी यथार्थ ठरते. गुरुपदाचे अनन्य साधारण महत्व असलेली प्राचिन भारतीय संस्कृती निसर्ग पूजक आहे. म्हणूनच केवळ जन्माच्या वा वर्णाच्या आधारे आमचे गुरुत्व अवलंबून नव्हते आणि नाही, हे ठासून सांगणारे दत्त महाराज हे खरोखरीच क्रांतीकारी युगात्मे होते असे मी मानतो. दत्तात्रयांच्या २४ गुरुंबद्दलचे वर्णन अवधूतोपाख्यानात सांगीतले आहे. मनुष्य योनीतील  वेश्येपासून पंचतत्व आणि प्राणी, वनस्पती, जलचर व किटकांनाही गुरु मानून त्यांच्या जगण्यातून शिकवण घेणार्या दत्तात्रयांपासून आपण नम्रता व गुणग्राहकतेची शिकवण घेतली तरी आयुष्य सफल होईल यात शंका नाही. आज श्री दत्त जयंतीच्या निमित्ताने विश्वगुरुंनी केलेल्या २४ गुरुंच्या संकल्पनेमागील तत्वबोध जाणून घेण्याचा अल्पसा प्रयत्न.

      ◆  भगवान श्री दत्तात्रयांनी भूमाता वसुंधरेला आद्य गुरुचा सन्मान बहाल केला. पृथ्वी पासून सहनशक्ती व क्षमाशिलतेचा गुण त्यांनी घेतला.
      ◆  त्यांनी दुसरा गुरू वायुला केले. सर्वत्र मुक्त संचार असुनही सुगंध वा दुर्गंध कश्यातही लिप्त नसणारा पवन सर्वांच्या शरिरात समप्रमाणात असतो. म्हणून अलिप्तता व समदर्शन हे गुण त्यांनी वायु पासून ग्रहण केले.
     ◆ आकाशाला विश्वगुरु दत्तात्रयांनी तृतीय गुरुचे स्थान दिले. सर्वसमावेशकता व अमर्याद मृदूत्वाच्या गुणांची शिकवण त्यांनी नभापासून घेतली.
   ◆  पाण्याला चवथा गुरु मानून दत्तप्रभूंनी शुध्दता व अभेद्यतेचे गुण प्राप्त केले.
   ◆ तेजस्वीता, अपरिग्रह आणि रसनेंद्रियांवरील विजय या गुणत्रयींसाठी त्यांनी अग्नीला पाचवा गुरु मानले.
      ◆  सहावा गुरु चंद्र. शुक्लपक्षात कलेकलेने वाढणार्या व कृष्णपक्षात कमी होत जाणार्या चंद्राकडून दत्तात्रयांनी तारुण आणि वार्धक्याच्या पलिकडील आत्म्याच्या चिरंतन अस्तित्वाचा बोध घेतला.
     ◆  जगाला प्रकाशमान करणार्या सूर्याला दत्त गुरुंनी सातवा गुरु मानले. परोपकार व समदृष्टीचा अनुग्रह त्यांनी सूर्याकडून घेतला.
        ◆ पारध्याच्या  जाळ्यात अडकलेल्या आपल्या पिलांना व मादीला सोडवायला गेलेले कबुतर सुध्दा त्यातच फसले. हे बघून कोणत्याही मोहजालात न फसण्याचा, अनासक्तीचा बोध त्यांनी या कपोत पक्षापासून घेतला. कबुतराला त्यांनी आठवा गुरु मानले.
         ◆ अजगराला भगवंतांनी नववा गुरु म्हटले आहे. कोणत्याही चवीच्या आहारी न जाण्याची शिकवण दत्त प्रभूंनी अजगरापासून घेतली.
       ◆ सागराला दत्तांनी दहावे गुरुपद बहाल केले. अथांगता आणि सखोलता ही व्यक्तीमत्वाची गुणवैशिष्ट्ये त्यांनी समुद्राकडून घेतली.
       ◆ दिव्याच्या ज्योतीवर मोहित झालेला पतंग तिच्यावर झेप घेऊन आपले प्राण गमावतो. हे दृष्य पाहून विश्वगुरुंनी पतंगापासून निर्मोही जीवनाचा गुरुमंत्र घेतला व त्याला अकरावा गुरु संबोधले.
           ◆ भुंग्यापासून सुध्दा त्यांनी शिकवण घेतली. एकाच फुलावर भार न टाकता व कुठल्याही फुलाला न दुखावता मध संकलन करणार्या भ्रमराला त्यांनी बारावा गुरु केले.
     ◆ लाकडाच्या सापळ्यात अडकून खड्ड्यात पडलेल्या हत्तीकडे पाहून दत्तांना स्त्री मोहात न पडण्याचा साक्षात्कार झाला. म्हणून त्यांनी हत्तीला तेरावा गुरु म्हटले.
       ◆ वणवण भटकून मधमाशी मध गोळा करते. परंतु, त्यांना मारुन भिल्ल मधाचे पोळे घेऊन जातो. म्हणून संग्रही वृत्ती त्यागन्याचा संदेश घेत त्यांनी मधमाशीला चौदावा गुरु केले.
      ◆  विकारांपासून दूर राहण्याचा धडा दत्तात्रयांनी पारध्याच्या नाद मधुर तालावर भुलून जाळ्यात अडकणार्या हरणाकडे बघून घेतला. यासाठी त्यांनी हरणाला पंधरावा गुरु केले.
     ◆ मासा अमिषाला बळी पडून गळाला फसतो व प्राण गमावतो. म्हणून माश्याला सोळाव्या गुरुस्थानी मानत दत्तात्रयांनी कुठल्याही गोष्टीच्या आहारी न जाण्याचा धडा शिकला.
   ◆ ग्राहक न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या पिंगला नामक वेश्येला एक गीत सुचले. अमंगल देहाचे विकार क्षणोक्षणी बदलत असले तरी आत्मा हा सदास्थिर व मंगलमय असतो आणि तोच खरा पती आहे. त्यामुळे परपुरुषाकडून सौख्याची अभिलाषा करणे व्यर्थ आहे. यापुढे जे मिळेल त्यात मी सुखी राहील असा दृढनिश्चय करुन झोपी गेलेल्या पिंगलेला आत्मतत्वाचे ज्ञान झाले. तिच्यापासून आत्मतत्वाचा बोध घेऊन दत्त प्रभूंनी तिला सतरावा गुरु केले.
         ◆ मांसाचा तुकडा चोचित घेऊन ऊडणार्या कुरार पक्षावर इतर पक्षी तुटून पडतांना पाहून आवडत्या वस्तूचा संग्रह न करण्याचा बोध गुरुदेवांनी या अठराव्या गुरु पासून घेतला.
   ◆ लहानश्या बाळाही अनसूया नंदनाने एकोणीसावा गुरु केले. निरागसपणा व अत्यानंदात राहण्याची शिकवण त्यांना बालकाने दिली.
           ◆ कुमारीकेकडून प्रभूंनी एकांताचा संदेश संपादन केले. पाहूणे पहायला आले असता स्वयंपाकाच्या तयारीत असलेल्या त्या मुलीच्या हातातील बांगड्यांचा आवाज होऊ लागला. त्यामुळे तिने दोन्ही हातात एकेकच बांगडी ठेवली. परिणामी तिचे काम कसल्याही आवाजाविना व्यवस्थित पार पडले. म्हणून साधकाने एकांत सेवन करावा हा बोध कुमारीकेपासून त्यांनी घेतला व तिला विसावे गुरुपद दिले.
       ◆ जगाच्या कोलाहलात न अडकता आत्मानंदात तल्लीन होण्याची शिकलण दत्तात्रयांनी शरकृतापासून घेतली. म्हणून त्यांनी समोरून राजाची वाजत गाजत मिरवणूक जात असतांनाही आपल्या बाण तयार करण्याच्या कामात गर्क असलेल्या कारागिरास एकविसावा गुरु केले.
   ◆ सापाला कुठलेही कायमचे घर नसते आणि तो सदैव सावध चित्त व गुप्तपणे वावरणारा असतो. म्हणून सापापासून शरिराचे क्षणभंगूरत्व व अखंड साधनेचा बोध दत्तात्रयांनी घेतला व त्याला बाविसावा गुरु केले.
    ◆ आपल्या बेंबीतून जाळे विणनारा कोळी स्वत : मात्र त्यात अटकत नाही. परमेश्वर सुध्दा स्रुष्टी निर्माण करतो मात्र, स्वत : अलिप्त राहातो. ईश्वराचे प्रतिनिधित्व करणार्या कोळ्याला म्हणूनच अत्री नंदनाने तेविसावा गुरु म्हटले.
   ◆ कुंभार माशी किटकाला आपल्या घरात बंदिस्त करुन ठेवते. तिच्या भयाने तो किटक सुध्दा कुंभारमाशी बनतो. हे चित्र पाहून आपण सुध्दा ईश्वराच्या नाम चिंतनात असे गढून जावे की ईश्वररुपास प्राप्त व्हावे हा गुरुमंत्र दत्तात्रयांनी तिच्यापासून घेतला. या करीता त्यांनी कुंभारमाशीला चोविसावा गुरु केले.

     या प्रमाणे भगवान श्री दत्तात्रयांनी चराचरातील २४ जीवांना गुरु मानले. आपण कोणत्याही पूजा पध्दतीचा अवलंब करीत असू, कोणत्याही धर्माचे अनुकरण करीत असू अथवा निरिश्वरवादी असू. परंतू आपण मानव आहोत. आणि मानवाचे ऐहिक जीवन सुखकर होण्यासाठी मन : शांती व आत्मबोधाशिवाय तिसरा मार्ग नाही हे वैश्विक सत्य आहे. या त्रिकालाबाधी सत्याचा साक्षात्कार दत्तात्रयांनी समस्त मानवतेस करुन दिला. म्हणूनच ते विश्वगुरु म्हणवले जातात. अश्या परमश्रध्देय विश्वगुरु भगवान श्री दत्तात्रयांनी उपदेशिलेल्या मार्गाचा अवलंब प्रत्येक मनुष्याच्या जीवनात आत्मनद व चिरसौख्याचा दीप अखंड तेवत ठेवतो. अश्या विश्वगुरुला प्रकट दिनानिमित्त त्रिवार अभिवादन करुन ही लेखन सेवा मी अवधूत चरणी सादर समर्पित करतो.

       ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

Saturday 25 November 2017

#भाष्य लेखांक - ९ दि. २६ नोव्हेंबर २०१७ #संविधान_दिनाचा_सांगावा " कानून के हाथ बडे लंबे होते है ", " देखो, गलती से कानून हाथ मे मत लेना " अशी तद्दन नाटकी डाँयलाँगबाजी पडद्यावर पाहात, लहानाची मोठी झालेली आपली पिढी, देशाच्या राज्य घटनेविषयी जाणून घ्यायला किती उत्सुक आहे हाच एक यक्ष प्रश्न आहे. आज बोकाळलेलं #काय_द्याचं_राज्य पाहता या देशाच्या कायदे निर्मितीचा इतिहास, तिचा आजवरचा प्रवास आणि भविष्यातील दिशा या तिन्ही बाबींवर चर्चा झालीच पाहिजे. परकीय गुलामगिरीतून स्वतंत्र झाल्या नंतर सांसदिय लोकशाही प्रणाली स्वीकारलेल्या या देशाला एका वैधानिक सूत्रात गुंफणरे, देशातील शासन व प्रशासनाला व्यवस्थेच्या चौकटीत बसवणारे आपले संविधान आहे तरी कसे यावर विचार मंथन होणे गरजेचे आहे. आजच्या संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय लोकशाहीचा आत्मा असलेल्या संविधानाचे आपण स्मरण करुया जेने करुन आपल्या भारतीयत्वाला नव्याने उजाळा मिळेल. इंग्रजी राजवटीचा शेवट होऊन १५ आँगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. या स्वतंत्र देशाला सार्वभौमत्व मिळवून देणार्या संविधानाची जन्मकथा हा एक रंजक व उद्बोधक अध्याय आहे. सर्वप्रथम कँबिनेट मिशनच्या अंतर्गत संविधान सभेच्या कार्यास प्रारंभ झाला. ६ डिसेंबर १९४६ पासून १४ आँगस्ट १९४७ पर्यंत हे कार्य चालले. दुसर्या टप्यात १५ आँगस्ट १९४७ पासून २६ नोव्हेंबर १९४९ पर्यंत संविधान निर्मिती प्रक्रिया आटोपून त्याचे राष्ट्रार्पण करण्यात आले. त्या नंतर २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान देशाला कायदा म्हणून लागु झाले. हा दिवस.आपण गणराज्य दिन म्हणून साजरा करतो. मात्र, घटनाकार डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ नोव्हेंबर २०१५ पासून दर वर्षी संविधान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सर्व शाळा, महाविद्यालये व शासकीय व निमशासकीय कार्यालयातून वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे हा संविधान दिवस दोन वर्षांपासून साजरा होऊ लागला आहे. परतु, जसे स्वातंत्र्य दिवस, गणराज्य दिवस हे एखाद्या कुळाचाराप्रमाणे आता सवयीचे झालेत व ते उरकण्याकडे लोकांचा कल वाढलाय ते पाहता या संविधान दिवसाचाही असाच ' कुळाचार ' होऊ नये ही खबरदारी आणि जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे. भारतीय संविधानाची कुळकथा आज आपण ज्या संविधानाच्या छत्रछायेखाली नांदतोय त्या संविधानाचे बीजारोपण स्वातंत्र्यपूर्वकाळात बरेच आधी झाले होते. १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांनी सर्वप्रथम अश्या संविधानाची संकल्पना मांडली होती. इंग्रजी अंमलाखाली असलेल्या भारतात स्थानिक जनतेने तयार केलेले कायदे असावे व त्यानूसार कारभार चालावा अशी मागणी त्यांनी केली होती. अर्थात ब्रिटीश साम्राज्यशाहीचा सूर्य पूर्ण तेजाने तळपत असतांनाच्या त्या काळात इंग्रजांनी टिळकांची मागणी साफ फेटाळून लावली. त्या नंतर गांधीजी आणि जवाहरलाल नेहरु यांनी सुध्दा अनुक्रमे १९२२ व १९२४ मध्ये याच आशयाची मागणी केली होती. मात्र त्यांच्या मागण्य सुध्दा इंग्रजांनी धुडकावल्या. मात्र १९३९ ला काँग्रेसच्या अधिवेशनात हा प्रस्ताव मंजूर झाला आणि संघटनात्मक दबावाची दखल घेणे इंग्रजांना भाग पडले. १९४० मध्ये इंग्रज सरकारने ही मागणी तत्वत : मान्य केली. पुढे १९४२ साली क्रिप्स कमिशनने आपला अहवाल सरकारला सादर केला. ज्यात भारतात निर्वाचित प्रतिनिधींची संविधान सभा स्थापून देशाची स्वतंत्र राज्य घटना निर्माण करण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली. दि. ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभेची विधीवत स्थापना करण्यात आली. मात्र मुस्लीम लिगने या संविधान सभेला अपशकुन केला. स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करीत त्यांनी या सभेवर बहिष्कार घातला. त्या नंतर दि. ११ डिसेंबर १९४९ रोजी डाँ. राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि त्यांच्याच नेतृत्वात स्वतंत्र भारताचे संविधान अस्तित्वात आले. दरम्यान १४ आँगस्ट १९४७ ला संविधान सभेचे पुनर्गठण झाले आणि २९ आँगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने संविधान समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची निवड करण्यात आली. डाँ. गोपालस्वामी अयंगार, ए. रामकृष्ण अय्यर, महंमद सादुल्लाह, के. एम. मुन्शी, बी. एल. मित्र, डी. पी. खेतान हे या मसुदा समितीचे सदस्य होते. या संविधान मसुदा समितीच्या बैठकी ११४ दिवस चालल्या . २ वर्ष ११ महिने १८ दिवस संविधान निर्मितीची प्रक्रिया चालू होती. एकूण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपयांचा खर्च या संविधान निर्मितीवर झाल्याची नोंद आहे. संविधानाचे लेखन करतांना ७६३५ सूचना व प्रस्तावांवर विचार करण्याण आला. अखेरीस २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान संपूर्ण देशासाठी लागू झाले. गेल्या ६७ वर्षात आपल्या राज्य घटनेत ९० पेक्षा जास्त दुरुस्त्या झाल्या असून या पुढे देखील आवश्यकता वाटेल तेंव्हा घटना दुरुस्ती होत राहणार आहे. संविधानाच्या नावाने ' मोहरम ' भारताचे संविधान अढळ आणि अक्षुण्ण आहे. भविष्यातही ते असेच राहील. मात्र, हे ठाऊक असुनही काही चिंतातूर जंतूना अधून मधून " संविधान खतरे मे " अशी बोंब ठोकून ऊर बडवून घेण्याची लहर येतच असते. जरा कुठे काही खट् वाजले की मनुस्मृती थोपवली जाणार असल्याची हूल उठवली जाते. संविधानाच्या नावाने चालणारा हा मोहरम आता टवाळीचा विषय बनलाय. जो पर्यंत हा देश भारत म्हणून ओळखला जाईल तो पर्यंत या देशात संविधान हेच सर्वतोपरी असेल. म्हणून संविधानाला राजकीय स्वार्थासाठी न वापरता त्याचा उपयोग देश हितार्थ करा हाच या संविधान दिनाचा सांगावा आहे. या संदेशाचे प्राणपणाने पालन करण्याचेच दुसरे नाव ' देशभक्ती ' आहे.

संविधान दिनाचा सांगावा

Saturday 18 November 2017

औचित्य पुरूष दिनाचे

भाष्य
लेखांक - ८                  दि. १९ नोव्हेंबर २०१७

#औचित्य_पुरुष_दिनाचे !

     अश्वस्य लक्षणम् वेगो, मत्तस्य गज लक्षणम् ।
     चातुर्य लक्षणम् नार्या, उद्योगो नर लक्षणम् ।।

     अर्थात, घोड्याचे लक्षण वेग असून मस्तवालपणा हे हत्तीचे लक्षण आहे, तसेच चतुरता हे स्त्रीचे तर उद्यमीवृत्ती हे पुरुषाचे लक्षण समजावे अश्या आशयाचे संस्कृत सुभाषित आहे. भारतीय संस्कृतीत मातृसत्ताक पध्दती आणि पुरुष प्रधान समाज रचना या दोन्ही प्रवाहांचे काळानुरुप अस्तित्व राहिल्याची वस्तुस्थिती विचारात घेता आजचा काळ स्त्री - पुरुष समानतेचा धरला जातो. तरी देखील हे सुभाषित आजही ' समयोचित ' असून स्त्री - पुरुष समानतेलाच अधैरेखित करणारे आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. योगायोगाने आज जागतिक पुरुष दिन असून त्या निमित्ताने पुरुषांच्या पौरुषत्वावर आणि ( ओघानेच ) स्त्रीयांच्या स्त्रीत्वावर साधक बाधक चर्चा झाल्यास ते निश्चितच औचित्याचे ठरेल.
     आज जगाची लोकसंख्या सुमारे ८ अब्ज असून, त्यात पुरुषांचे प्रमाण साधारणत : ५२ टक्के आहे. अर्थात अविकसित आणि विकसनशिल देशांमध्ये स्त्रीयांपेक्षा पुरुषांची सख्या अधिक तर विकसित देशांमध्ये स्त्रीयांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असल्याचे आढळते. शिवाय विकसित देशांमधील स्त्रीयांमध्ये स्त्री शिक्षण व सबलीकरणाचे प्रमाण देखील उल्लेखनिय आहे. भारताच्या सदर्भात विचार केल्यास, मध्ययुगातील पुरुषी वर्चस्वाच्या पाऊलखूणा आपल्या कुटूंब व्यवस्थेतून व समाज रचनेतून अद्यापही पूर्णपणे मिटल्या, असा दावा करणे धाडसाचे होईल. म्हणूनच पुरुष दिनाचे भारतीय पार्श्वभूमीवरील औचित्य हा सहाजिकच चर्चेचा मुद्दा बनतो. जागतिक महासत्ता बनण्याचा संकल्प उच्चारत असतांना भारतातील स्त्री - पुरुष संबंधावर आणि त्यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करणे क्रमप्राप्त ठरते. विशेषत : धार्मिक अंगाने पुरुषी वर्चस्वाला काहीसे पाठबळ मिळत असल्याचे मान्य करतांनाच कायद्याच्या अंगाने स्त्रीयांना बरेचसे झुकते माप दिले जात असल्याचेही नाकारून चालणार नाही. किंबहूना धार्मिक आघाडीवर माघारलेल्या स्त्रीयांना समोर आणन्यासाठी कायद्याचा हात पुढे केला गेला असे म्हणने अधिक सयुक्तिक होईल. हे सर्व मान्य करुन देखील निसर्गाच्या न्यायानुसार स्त्री आणि पुरुष हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे अंतिम सत्य सुध्दा विसरुन चालणार नाही.

#पुरुष_दिनाची_पूर्वपिठीका

       जागतिक पातळीवर स्त्रीयांमध्ये जाणीव जागृती होत असतांना देशोदेशीच्या सरकारांनी स्त्रीयांना सरक्षण देणारे कायदे व प्रोत्साहन देणार्या योजना राबवणे सुरु केले. याचा परिणाम म्हणून कुटूंबात व समाजात महिलांचे महत्व वाढले. शिक्षण, नोकरी आणि अधिकाराच्या क्षेत्रात महिलांची प्रगती सुरु झाली. साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातही याचे पडसाद उमटू लागले. पुरुषांच्या बरोबरीने महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात कमी - अधिक प्रमाणात जाणवू लागला. एकूणच महिलांना ' अच्छे दिन ' येणे सुरु झाले. परंतू, याची दुसरी बाजू सुध्दा हळूहळू समोर येऊ लागली. महिलांमधील काही घटकांमध्ये पुरुषांविषयीचा अकारण मत्सर जागृत होऊन त्याचा त्रास काही निर्दोष पुरुषांना होऊ लागला. वास्तविक महिला उत्थानामध्ये पुरुषांची भूमिका महत्वाची होती. सर्वच पुरुष वाईट नसतात. मात्र, कौटूंबिक हिंसाचार कायद्याचा हेतूपुरस्सर करुन पुरुषांना नाहक टार्गेट करण्याचे प्रकार मागील काळात वाढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यात केलेल्या सुधारणेमुळे यात आता घट झाली आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या पाठीवर सर्वत्र हे घडत आहे. म्हणूनच अफ्रिकेतल्या त्रिनिदाद टोबेगो या द्विप समूह असलेल्या देशामधील पुरुषांनी ' पुरुष दिन ' ही संकल्पना सर्वप्रथम उगम पावली. तेथे १९९९ मध्ये १९ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा पुरुष दिवस साजरा झाला. जगातील ६० देशांमध्ये आज हा दिवस साजरा केला जातो. भारतात २००७  मध्ये याची सुरुवात झाली. लैंगिक समानता वाढवणे, पुरुषांची सकारात्मक भूमिका अधिक बळकट करणे, कुटूंब व समाजासाठी पुरुषांकडून होत असलेले कार्य प्रकाशात आणने अश्या उद्देशाने हा दिवस साजरा होत असतो. तसे पाहता हजारो वर्षांपासून पुरुषांची मक्तेदारी असतांना कश्यासाठी हवा पुरुष दिन ? असा प्रश्न सहाजिकच विचारला जातो. मात्र, बदलती सामाजिक परिस्थिती पाहता आज अनेक क्षेत्रात महिला अग्रेसर असून घरातही महिलांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले दिसते. खरोखरीच ही एक आदर्श परिस्थिती म्हणावी लागेल. परंतु, खर्या अर्थाने स्त्री _ पुरुष समानतेचे स्वप्न पूर्णत : साकार व्हावयाचे असेल तर दोघांपैकी कोणावरही अन्याय किंवा पक्षपात व्हायला नको. यासाठी दोन्ही घटकांनी परस्परांचा सन्मान राखून सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे. गरज पडल्यास पुरुषांनी अजुनही चार पावले मागे यायला हरकत नसावी. कारण, नवसमाज निर्मितीसाठी हे होणे आवश्यक नव्हे तर अनिवार्य आहे. स्त्रीचे चातुर्य आणि पुरुषांची उद्यमशिलता एकत्र आल्यास घर, समाज, देश आणि विश्वाचे कुशल - मंगल निश्चितच होईल यात कसलीच शंका नाही.