Wednesday 29 August 2012

खामगाव-जालना रेल्वेमार्ग : स्वातंत्रोत्तर उपेक्षेची कर्म कहाणी

                महाराष्ट्राच्या नकाशावर मागासलेपणाचा शिक्का कपाळी लागलेला बुलढाणा जिल्हा. खरे तर या जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल की १०० वर्षे उलटून गेलीत तरी इंग्रजकालीन हा रेल्वेमार्ग अद्यापही अस्तित्वात आला नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला देशातील परकीय राजवट संपली, मात्र त्या नंतर ६५ वर्षे उलटून गेलीत तरी आमच्या जिल्ह्यातील जनता  मागासलेपणाच्या गुलामगिरीत खितपत पडली आहे. आजपर्यंत कित्येक सरकारे आली आणि गेली. आमचे  नशीब पालटलेच नाही. राजकीय अनास्थेचा बळी ठरलेला हा रेल्वेमार्ग या जिल्ह्यातील आजपर्यंतच्या नेतृत्वाचे खुजेपण सुद्धा अधोरेखित करून जातो हे देखील तेवढेच खरे आहे.
            स.न.१९१० चा तो काळ होता. ब्रिटीश सरकारने वर्हाड प्रांतातील सुपीक काळ्या कसदार मातीतून पिकणारा उच्च प्रतीचा कापूस इंग्लंडात कच्चामाल म्हणून वाहून नेण्यासाठी वर्हाडातील  खामगाव पासून निजाम स्टेट मधील जालना या स्थानका पर्यंत  रूळ टाकण्याचे काम हाती घेतले.सेंट पेनेन्झुला या कंपनीला कामाचे कंत्राट दिले. परंतु, दुर्दैवाने तेव्हाच द्वितीय महायुद्ध सुरु झाले आणि त्या नंतर लगेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याने अंतिम चरण गाठल्या मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणात या  मार्गाचे काम  बंद पडले. यथावकाश देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा प्रत्येक देशवासीया प्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला देखील स्वराज्य आणि सुराज्य हातात हात घालून सोबत येईल असे वाटले. परंतु, आमच्या दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नाहीत उलट खामगाव-जालना रेल्वे मार्गाचे आमचे स्वप्न हे दिवास्वप्न होऊन राहिले आहे.
                                                        तर विकासाचा सूर्योदय दूर नाही ...
             मागील ५ वर्षांपासून रेल्वे लोक आंदोलन समितीने हा  मार्ग आणखी थोडा पुढे वाढवून शेगाव-जालना रेल्वेमार्ग लवकरात लवकर व्हावा अशी मागणी लाऊन धरली आहे. १५५ किलो मीटरचा हा प्रस्तावित  मार्ग असून सुमारे  ३२५ कोटी रुपये खर्चाचा आहे. आधीच शेतकरी आत्महत्या ग्रस्त आणि औद्योगिक विकासाच्या आघाडीवर मागासलेल्या या जिल्ह्यातील जनतेला या रेल्वेमार्गामुळे विकासाचा सूर्योदय दिसणार आहे.खामगाव,चिखली आणि देऊळगाव राजा या तिन्ही तालुक्यातील एम आय डी सी मध्ये अनेक नवनवीन उद्योग येतील,येथील शेतकऱ्याच्या मालाला देशभरातील मोठ्या बाजारपेठा मिळतील, दळणवळणाची जलद आणि देशव्यापी सुविधा उपलब्द्ध झाल्या मुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सह लोणार,सिंदखेड राजा, सैलानी दर्गा, गिरडा अश्या अनेक दुर्लक्षित पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल.या सह विकासाच्या  अगणित नव्या वाटा बुलढाणा जिल्ह्यातील जनते समोर खुल्या होतील. शेगाव-जालना हा प्रस्तावित रेल्वेमार्ग केवळ बुलढाणा जिल्ह्या साठी नव्हे तर विदर्भ-मराठवाड्यासह  संपूर्ण महाराष्ट्रा साठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास दक्षिण आणि मध्य रेल्वे जोडल्या जातील. विदर्भाची पंढरी शेगाव आणि महाराष्ट्राची पंढरी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे परस्परांना जोडली जातील. ही देखील एक मोठी उपलब्धी ठरेल. 
                  स्वातंत्र्याने दिली केवळ उपेक्षा आणि अनास्था ...
      ११२ वर्षांपासून प्रदीर्घ काळ प्रलंबित आणि स्वातंत्रोत्तर काळात कायम उपेक्षित असलेल्या या रेल्वे मार्गाचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ निवडणुकी पुरता वापरला आणि प्रत्यक्षात मतदारांच्या तोंडाला चक्क पाने पुसली. आता मात्र रेल्वे लोक आंदोलन समितीने  शेगाव-जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. परंतु, खेदाची बाब ही म्हणावी लागेल की खासदार प्रतापराव जाधव यांची भूमिका अत्यंत निष्क्रियतेची असून अन्य लोक प्रतिनिधी देखील या बाबत उदासीन आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरू शकणार्या या मार्गाला राज्य सरकारने ५०% भागीदारी तत्काळ मंजूर करावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकार कडे अतिशीघ्र सदर करावा अशी मागणी रेल्वे लोकआंदोलन समिती मागील ३ वर्षांपासून करीत आहे. जालना येथील रेल्वे मार्ग संघर्ष समिती देखील या कामात आमच्या बरोबर आहे. माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला गेला होता. मात्र, त्यावर अजून देखील काहीच निर्णय झाला नाही.   दोन वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता ब्यानर्जी यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प मांडतांना या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, दोन वर्षे उलटून गेलीत तरीही अद्याप या सर्वेक्षनाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले नाहीत. आज पर्यंत तोट्याचा म्हणून हा रेल्वेमार्ग प्रत्येक वेळेस दुर्लक्षित ठेवला गेला. मात्र महाराष्ट्रातीलच या पेक्षाही अधिक तोटा दाखविणारे अनेक रेल्वेमार्ग कधीचेच अस्तित्वात आलेत आणि आज नफ्यात आहेत ही वस्तुस्थिती मात्र विद्यमान सरकार सहेतुकपणे  नजरेआड करीत आहे.
       एकूणच शेगाव-जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या पाठीशी केवळ बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील यच्ययावत बुद्धीजीवी आणि श्रमजीवी वर्गासह सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी,व्यापारी,युवक,महिला आदी सर्व समाज घटकांनी तन,मन,धन पूर्वक आपले बळ उभे करणे अपेक्षित आहे. या निमित्ताने आपल्या राज्यातील एका मागास जिल्ह्यातील जनतेला विकासाची समान संधी उपलब्द्ध होईल आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.......................वंदे मातरम !!!
................................................रेणुकादास मुळे
...............( सहसचिव- रेल्वे लोकआंदोलन समिती, बुलढाणा जिल्हा )

Tuesday 17 July 2012

माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विनोद !

माझ्या फेसबुक वरील मैत्रांनो , आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा विनोद सांगणार आहे. तसे मी २००९ पासून फेसबुक वर असल्याचे मला आठवते. मात्र दि.१ मे २०११ पासून माझा या सोशल नेट्वर्किंग साईट वरील खरा वावर सुरु झाला. आज या गोष्टीला १४ महिने पूर्ण झाले आहेत. या दरम्यान आजपर्यंत मला २४४१ मैत्र लाभलेत. या मध्ये काही समविचारी तर काही विरोधी विचारांचे देखील आहेत. काही जन तठ्स्त तर काही केवळ हौसे मौजे खातर फेसबुक वर आलेले आहेत. काही असे पण आहेत की ज्यांचे अकौंट बळजबरीने काढले असेल. तर असो, मी मात्र अगदी विचारपूर्वक या माध्यमाशी जोडलेला आहे. राष्ट्रवादी ( शरद पवारांचा ढोंगी आणि स्वार्थी राष्ट्रवाद नव्हे. तो  तर सच्च्या राष्ट्रवादाला लागलेला कलंक आहे )विचारांचा प्रचार-प्रसार करणे आणि सर्वदूर पसरलेल्या माझ्या राष्ट्रनिष्ठ लोकांना जोडणे हे माझे मुख्य ध्येय आहे. आईच्या गर्भात असल्या पासून माझ्यावर रा.स्व.संघाचे संस्कार झाले असून माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत ते कायम राहतील. मला त्या बद्दल यथार्थ अभिमान आहे. ही बाब मी कधीच लपवून ठेवली नाही.
         मी संघ स्वयंसेवक असल्यामुळे साहजिकच माझ्या विचारातून आणि लिखाणातून संघाचा सांस्कृतिक राष्ट्रवाद क्षणोक्षणी डोकावतो. मात्र, फेसबुक वरील काही अजाण लोकांनी  या बद्दल भलताच गैरसमज करून घेतला आहे. त्यांच्या मते रेणुकादास मुळेला फेसबुक वर बसून संघाचा प्रचार करण्याचे तासाप्रमाणे पैसे मिळतात. आता या मूढमती मित्रांच्या जावईशोधावर हसावे की त्यांच्या बालिश बुद्धीची कीव करावी असा प्रश्न मला पडलाय. जीवनात कधीच कोणत्या विचारधारेचा पुसटसाही स्पर्श न झालेले लोक असाच समज करून घेणार हे मला समजते. मी संघ विचाराने काम करतो. जगात मार्क्सवाद, गांधीवाद, समाजवाद , लेनिनवाद असे अनेक विचारप्रवाह आहेत. त्या-त्या विचाराने प्रभावित झालेले कार्यकर्ते  आपापल्या परीने कार्य करीत आहेत. त्यांच्या विषयी देखील असाच विचार केला गेला तर तो कितीसा समर्थनीय ठरेल ? निश्चितच अश्या गैरसमजाचे कोणीच समर्थन करू शकणार नाही. एखाद्या विचाराने प्रेरित होणे ह्या अनुभूतीची जाणीव ज्यांच्या जीवनास कधी झालीच नाही त्यांना मात्र हे सर्व माफ आहे. अश्याच पैकी एक असावा की ज्याने माझ्या फेसबुक वरील अस्तित्वला पैश्याच्या तराजूत तोलण्याचा बालिश प्रयत्न केला. त्या  'विनोद'वीराला मी समजून घेतले आहे. आणि त्याचा तर्क हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा 'विनोद' ठरला असून त्या विनोदाचा जन्मदाता म्हणून 'खरे' तर तो अभिनंदनास पत्र ठरतो. अभिनंदन मित्रा,........वंदे मातरम !!!

Saturday 23 June 2012

वंदे मातरम !!!


वेद मंत्रोसे प्रिय अधिक है..
हमको वंदे मातरम !!!

Friday 1 June 2012

शाम मानव ... हिंदू विरोधी भोंदू सुधारक !

           अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा सरचिटणीस शाम मानव हा  तद्दन ढोंगी माणूस असल्याचा अनुभव मला १० वर्षांपूर्वीच आला होता. त्याचे झाले असे की, मी सकाळ मध्ये काम करीत असतांना एकदा आमचे जिल्हा बातमीदार गुळवे अण्णा हे काही कामानिमित्ताने बाहेरगावी गेले होते. त्यांनी मला कार्यालय सांभाळायला बुलढाण्याला पाठविले असता शाम मानवच्या पत्रकार परिषदेला जाण्याचा योग आला. सुरवातीला शाम मानवने आवेशपूर्ण भाषण ठोकले.त्यानंतर पत्रकारांना प्रश्न विचारण्याचे आवाहन केले.पत्रकारांनी विचारलेल्या सोयीस्कर प्रश्नांना त्याने उत्साहात उत्तरे दिली मात्र,अडचणीच्या प्रश्नांना हा पुरोगामी माणूस खुबीने बगल देऊ लागला. मी आणि सामनाचे जिल्हा प्रतिनिधी राजेश देशमाने यांनी त्याला सैलानी दर्ग्यावर चालनार्या भोंदुगिरी बद्दल छेडले असता तो पुरता गांगरला.
     बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी दर्गा येथे मानसिक रुग्णांवर उपचाराच्या नावाखाली चालणारे छु...मंतर, गंडे-दोरे, मुक्या जीवांचे बळी, महिलांचे अंगात येणे आणि झुलणे अश्या गैरप्रकारांसह एकटी-दुकटी बाई पाहून कामपिपासू नराधमांकडून केले  जाणारे पाशवी बलात्कार असा कुकार्मांचा पाढा मी वाचला. हे प्रकार नक्कीच समर्थनीय नाहीत तर मग आपण या विरुद्ध का आवाज उठवत नाही असा भाबडा प्रश्न मी विचारला. पण माझ्या या आगळीकीने शाम बाबूचे पित्त खवळले.तो उसळून बोलू लागला, नेमके उत्तर टाळू लागला. मी पुन्हा थेट प्रश्न टाकला की हिंदू धर्मातील अंधश्र्द्धांबद्दल आपण पोटतिडकीने बोलता, आम्ही पण अश्या कालबाह्य रूढी आणि बुरसटलेल्या गोष्टींना विरोधच करतो परंतु , तुम्ही केवळ हिंदू धर्मातीलच उदाहरणे का देता ? तुम्हाला इतर धर्मांतील उदाहरणे दिसत नाहीत काय ?" आता मात्र या मानवरूपी दानवाचा विवेकवाद पार झोपी गेला होता. तो उत्तरला "मी काय बोलायचे अन काय करायचे हे तुम्ही मला शिकवू नका. मी हिंदू धर्मात जन्मलो म्हणूनच मी हिंदू धर्मावर टीका करू शकतो. मुस्लीम धर्मावर टीका केल्यास मला जीव गमवावा लागेल आणि मी त्याला तयार नाही." त्याच्या या पूर्णत: विसंगत उत्तराने सर्व पत्रकार गोंधळले. काही वेळेपूर्वी स्वताला निधर्मी, बुद्धीवादी, निर्भीड आणि परखड म्हणून पोपटपंची करणारा शाम मानव लगेच पलटल्याचे पाहून आमच्या आश्चर्याला पारावर उरला नाही.
     अखेर शाम मानवने ती प्रेस गुंडाळली आणि हळूच तेथून  सटकला. हळू-हळू आम्ही पत्रकार सुद्धा चर्वितचर्वण करीत आपापल्या वाटेला लागलो. मी मात्र शाम मानवचे खरे रूप समजून चुकलो होतो. स्वताला पुरोगामी, निधर्मी आणि तत्ववादी म्हणविणारा हा शाम मानव स्वताच मोठा भोंदू बाबा आहे. केवळ हिंदू धर्माशी खुन्नस ठेवायची आणि स्वताच्या जीवावर बेतली की शेपूट घालायचे हीच या हिंदू विरोधी वळवळयांची फितरत असल्याचे सत्य तेव्हा मला उमगले. तुम्ही सुद्धा अश्या भोंदू सुधारकांना ओळखून असा.त्यांचा पुरोगामित्वाचा बुरखा फाडण्याची संधी आल्यास मुळीच दवडू नका. तूर्तास एवढेच .....
                                                                                                                                                                                                                               वंदे मातरम !!!