Wednesday 29 August 2012

खामगाव-जालना रेल्वेमार्ग : स्वातंत्रोत्तर उपेक्षेची कर्म कहाणी

                महाराष्ट्राच्या नकाशावर मागासलेपणाचा शिक्का कपाळी लागलेला बुलढाणा जिल्हा. खरे तर या जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल की १०० वर्षे उलटून गेलीत तरी इंग्रजकालीन हा रेल्वेमार्ग अद्यापही अस्तित्वात आला नाही. १५ ऑगस्ट १९४७ ला देशातील परकीय राजवट संपली, मात्र त्या नंतर ६५ वर्षे उलटून गेलीत तरी आमच्या जिल्ह्यातील जनता  मागासलेपणाच्या गुलामगिरीत खितपत पडली आहे. आजपर्यंत कित्येक सरकारे आली आणि गेली. आमचे  नशीब पालटलेच नाही. राजकीय अनास्थेचा बळी ठरलेला हा रेल्वेमार्ग या जिल्ह्यातील आजपर्यंतच्या नेतृत्वाचे खुजेपण सुद्धा अधोरेखित करून जातो हे देखील तेवढेच खरे आहे.
            स.न.१९१० चा तो काळ होता. ब्रिटीश सरकारने वर्हाड प्रांतातील सुपीक काळ्या कसदार मातीतून पिकणारा उच्च प्रतीचा कापूस इंग्लंडात कच्चामाल म्हणून वाहून नेण्यासाठी वर्हाडातील  खामगाव पासून निजाम स्टेट मधील जालना या स्थानका पर्यंत  रूळ टाकण्याचे काम हाती घेतले.सेंट पेनेन्झुला या कंपनीला कामाचे कंत्राट दिले. परंतु, दुर्दैवाने तेव्हाच द्वितीय महायुद्ध सुरु झाले आणि त्या नंतर लगेच भारतीय स्वातंत्र्य लढ्याने अंतिम चरण गाठल्या मुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या वातावरणात या  मार्गाचे काम  बंद पडले. यथावकाश देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा प्रत्येक देशवासीया प्रमाणेच बुलढाणा जिल्ह्यातील जनतेला देखील स्वराज्य आणि सुराज्य हातात हात घालून सोबत येईल असे वाटले. परंतु, आमच्या दुर्दैवाचे दशावतार इथेच संपले नाहीत उलट खामगाव-जालना रेल्वे मार्गाचे आमचे स्वप्न हे दिवास्वप्न होऊन राहिले आहे.
                                                        तर विकासाचा सूर्योदय दूर नाही ...
             मागील ५ वर्षांपासून रेल्वे लोक आंदोलन समितीने हा  मार्ग आणखी थोडा पुढे वाढवून शेगाव-जालना रेल्वेमार्ग लवकरात लवकर व्हावा अशी मागणी लाऊन धरली आहे. १५५ किलो मीटरचा हा प्रस्तावित  मार्ग असून सुमारे  ३२५ कोटी रुपये खर्चाचा आहे. आधीच शेतकरी आत्महत्या ग्रस्त आणि औद्योगिक विकासाच्या आघाडीवर मागासलेल्या या जिल्ह्यातील जनतेला या रेल्वेमार्गामुळे विकासाचा सूर्योदय दिसणार आहे.खामगाव,चिखली आणि देऊळगाव राजा या तिन्ही तालुक्यातील एम आय डी सी मध्ये अनेक नवनवीन उद्योग येतील,येथील शेतकऱ्याच्या मालाला देशभरातील मोठ्या बाजारपेठा मिळतील, दळणवळणाची जलद आणि देशव्यापी सुविधा उपलब्द्ध झाल्या मुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव सह लोणार,सिंदखेड राजा, सैलानी दर्गा, गिरडा अश्या अनेक दुर्लक्षित पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढेल.या सह विकासाच्या  अगणित नव्या वाटा बुलढाणा जिल्ह्यातील जनते समोर खुल्या होतील. शेगाव-जालना हा प्रस्तावित रेल्वेमार्ग केवळ बुलढाणा जिल्ह्या साठी नव्हे तर विदर्भ-मराठवाड्यासह  संपूर्ण महाराष्ट्रा साठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. हा रेल्वेमार्ग अस्तित्वात आल्यास दक्षिण आणि मध्य रेल्वे जोडल्या जातील. विदर्भाची पंढरी शेगाव आणि महाराष्ट्राची पंढरी ही दोन्ही तीर्थक्षेत्रे परस्परांना जोडली जातील. ही देखील एक मोठी उपलब्धी ठरेल. 
                  स्वातंत्र्याने दिली केवळ उपेक्षा आणि अनास्था ...
      ११२ वर्षांपासून प्रदीर्घ काळ प्रलंबित आणि स्वातंत्रोत्तर काळात कायम उपेक्षित असलेल्या या रेल्वे मार्गाचा मुद्दा प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ निवडणुकी पुरता वापरला आणि प्रत्यक्षात मतदारांच्या तोंडाला चक्क पाने पुसली. आता मात्र रेल्वे लोक आंदोलन समितीने  शेगाव-जालना रेल्वेमार्गाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. परंतु, खेदाची बाब ही म्हणावी लागेल की खासदार प्रतापराव जाधव यांची भूमिका अत्यंत निष्क्रियतेची असून अन्य लोक प्रतिनिधी देखील या बाबत उदासीन आहेत. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचा राजमार्ग ठरू शकणार्या या मार्गाला राज्य सरकारने ५०% भागीदारी तत्काळ मंजूर करावी आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकार कडे अतिशीघ्र सदर करावा अशी मागणी रेल्वे लोकआंदोलन समिती मागील ३ वर्षांपासून करीत आहे. जालना येथील रेल्वे मार्ग संघर्ष समिती देखील या कामात आमच्या बरोबर आहे. माजी मंत्री आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून हा प्रस्ताव राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला गेला होता. मात्र, त्यावर अजून देखील काहीच निर्णय झाला नाही.   दोन वर्षांपूर्वी तत्कालीन रेल्वे मंत्री ममता ब्यानर्जी यांनी लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प मांडतांना या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे काम सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, दोन वर्षे उलटून गेलीत तरीही अद्याप या सर्वेक्षनाचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले नाहीत. आज पर्यंत तोट्याचा म्हणून हा रेल्वेमार्ग प्रत्येक वेळेस दुर्लक्षित ठेवला गेला. मात्र महाराष्ट्रातीलच या पेक्षाही अधिक तोटा दाखविणारे अनेक रेल्वेमार्ग कधीचेच अस्तित्वात आलेत आणि आज नफ्यात आहेत ही वस्तुस्थिती मात्र विद्यमान सरकार सहेतुकपणे  नजरेआड करीत आहे.
       एकूणच शेगाव-जालना रेल्वे मार्गासाठी रेल्वे लोकआंदोलन समितीच्या पाठीशी केवळ बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील यच्ययावत बुद्धीजीवी आणि श्रमजीवी वर्गासह सामाजिक कार्यकर्ते,शेतकरी,व्यापारी,युवक,महिला आदी सर्व समाज घटकांनी तन,मन,धन पूर्वक आपले बळ उभे करणे अपेक्षित आहे. या निमित्ताने आपल्या राज्यातील एका मागास जिल्ह्यातील जनतेला विकासाची समान संधी उपलब्द्ध होईल आणि कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येण्यास मदत होईल.......................वंदे मातरम !!!
................................................रेणुकादास मुळे
...............( सहसचिव- रेल्वे लोकआंदोलन समिती, बुलढाणा जिल्हा )